Saturday, 25 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४८)

मनुष्य कोणता का व्यवसाय करीत असेना, तो जर प्रामाणिकपणे कष्ट करीत असेल, तर धनसंपत्ती त्याच्याकडं आपोआप चालून येते, हे व्यापाराचं उदाहरण देऊन तुकारामांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,

४८

धनवंता घरीं ! करी धन चि चाकरी !!१!!
होय बैसल्या व्यापार ! न लगे सांडावे चि घर !!२!!
रानीं वनीं द्वीपीं ! असती ती होती सोपी !!३!!
तुका म्हणे मोल ! देता काही नव्हे खोल !!४!!
                  (अभंग क्र. २७९९)

ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं, त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं. व्यापाराचं उदाहरण घेतलं, तरी हे स्पष्ट होतं. व्यापार घरबसल्या होत असतो. ग्राहक व्यापाऱ्याकडं येत असल्यामुळं व्यापाऱ्याला घर सोडावं लागतच नाही. मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडं धन असलं, की त्याची सगळी कामं सोपी होतात. त्याला जे काही हवं असतं, त्याची किंमत मोजली, की त्याला सर्व काही मिळतं, त्याच्या दृष्टीने काही अवघड रहात नाही. संसार सुखाचा करू इच्छिणाऱ्या माणसानं धनाचा द्वेष करू नये, कोणता ना कोणता उद्योग नीट करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं, हा तुकारामांचा मोलाचा सल्ला आहे.

(संग्राहक संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 18 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४७)

संसार
      संसार यशस्वी कसा करावा, याचं अगदी व्यावहारिक आणि तरीही सैद्धांतिक स्वरूपाचं वर्णन करणारा त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

४७

जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारें वेच करी !!१!!

उत्तम चि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!२!!

परउपकारी नेणे परनिंदा ! परस्त्रिया सदा बहिणी माया !!३!!

भूतदया गाईपशूचे पालन ! तान्हेल्या जीवन वनामाजी !!४!!

शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढवी महत्त्व वडिलांचे !!५!!

तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ ! परमपद बळ वैराग्याचे !!६!!
                          (अभंग क्र. २८६४)

            उत्तम व्यवहार करून धन जोडावं. याचा अर्थ ते गैरमार्गानं मिळवू नये. कुणाला फसवून, कुणाला लुबाडून मिळवू नये. दुसऱ्याच्या कष्टाचं फळ आपण ओरबडून घेऊ नये. कष्ट करावेत. राबावं. घाम गाळावा. शहाणपणानं नेटका, निर्दोष व्यवहार करावा आणि या पद्धतीनं धन मिळवावं. समृद्धी उभी करावी. अशा नैतिक मार्गानं मिळवलेलं जे धन असेल, त्याच्या मोहात मात्र अडकू नये. त्याची आसक्ती धरू नये. त्याचा योग्य उपयोग जरूर करावा, पण तो काहीसा तटस्थपणानं, अलिप्त वृत्तीनं करावा. संपत्तीच्या बाबतीत अत्यंत संतुलित भूमिका तुकारामांनी इथं मांडल्याचं आढळतं. जो मनुष्य इतक्या विचारी पद्धतीनं वर्तन करील, तो उत्तम गतीच प्राप्त करील. त्याचं कल्याण होईल. इथं परंपरागत पद्धतीनं पारलौकिक गतीही तुकारामांना अभिप्रेत असली, तरी ते ऐहिक गतीलाही अचूकपणे लागू पडतं, यात शंका नाही.
           वर्तनाचे आणखीही काही नियम तुकारामांनी इथं सांगितले आहेत. माणसानं दुसऱ्यावर उपकार करावा. अडीअडचणीत असलेल्या, गोरगरीब, दुःखीकष्टी माणसांना मदत करावी. या उपदेशानुसार वागणारा हा मनुष्य दुसऱ्याची निंदाही करीत नाही. याचा अर्थ दुसऱ्याचा मत्सर करण्याची, द्वेष करण्याची त्याची वृत्ती नसते. परस्त्रियांना तो मायबहिणींप्रमाणं मानतो. याचा अर्थ तो आपलं शील जपतो. पत्नीची अवहेलना करीत नाही. तिच्याशी सुखसमाधानानं संसार करतो. त्याच्या अंगी भूतदया असते. प्राणिमात्रांविषयी कणव असते. आपलेपणा असतो. त्यांच्या सुखदुःखांत सहभागी होण्याची वृत्ती असते. तो गाईंचं व इतर गुरांचं नीट पालन करतो. त्यांची काळजी घेतो. त्याद्वारे घरात दूधदुभतं भरपूर मिळेल, अशी व्यवस्था करतो. रानावनात कोणी तहानलेला असेल, तर त्याला पाणी देतो. याचा अर्थ कोणी संकटात असला, तर त्याला मदतीचा हात देतो. त्याच्याशी बेपर्वाईनं वागत नाही. त्याची उपेक्षा करीत नाही. त्याच्याशी आपलं काय देणं-घेणं आहे, अशी भूमिका घेत नाही. तो आपली मनःशांती ढळू देत नाही. माणसाच्या जीवनात अनेकदा अस्वस्थ होण्यासारखे प्रसंग येतात. संकटांचे आघात होतात. निंदा-टीका पचवण्याचे प्रसंग येतात. परंतु हे सर्व शांतपणे झेलण्याची मनोवृत्ती त्यांच्याकडं असते. तो अशा प्रसंगांमुळं खचून जात नाही. आपला तोल जाऊ देत नाही. मनःशांती ढळू देत नाही. तो कुणाचंही वाईट चिंतत नाही. दुसऱ्याचं नुकसान व्हावं, म्हणून त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा दुष्टावा करीत नाही. अशा प्रकारच्या वर्तनामुळं तो आपल्या वडिलांचं महत्त्व वाढवतो. आपल्या वाडवडिलांचा, पूर्वजांचा लौकिक वाढवतो. अमुक-अमुक दांपत्याचा मुलगा असा विवेकी, निःस्पृह, संयमी, समंजस, कर्तबगार आहे, असं लोक म्हणतात, तेव्हा त्याच्या आईवडिलांचा गौरव होतो. अशा प्रकारचं अत्यंत समाधानी, तृप्त, निरामय जीवन हेच गृहस्थाश्रमाचं फळ होय. संसार करायचा, तो अशा प्रकारचं आनंदी जीवन भोगण्यासाठीच होय. संपत्तीची हाव धरून, त्यासाठी अनिष्ट मार्ग पत्करून, इतरांना लुबाडून, अन्याय करून वैभव उभं करणं आणि विलासात, सुखोपभोगात लोळणं, हे काही गृहस्थाश्रमाचं प्रयोजन नव्हे. संसारात राहून संयत जीवन जगणं, ही खरं तर वैराग्याची सर्वोच्च अवस्था म्हटली पाहिजे, हे वैराग्याचं सामर्थ्य म्हटलं पाहिजे. वैराग्य अनुभवण्यासाठी बैरागी होण्याची वा संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहून, संयमपूर्वक अनुरागी बनूनही वैराग्याचा अनुभव घेता येतो, यात शंका नाही.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Monday, 13 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४६)

तुकारामांच्या ईश्वरविषयक धारणा अतिशय वस्तुनिष्ठ होत्या. ईश्वर आपल्या स्वतःच्या जवळच असतो, त्याला इतरत्र शोधणं व्यर्थ आहे, अशी त्यांची भावना होती. एका अभंगात ते म्हणतात,

४६

देहीं असोनिया देव ! वृथा फिरतो निर्दैव !!१!!
देव आहे अंतर्यामीं ! व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं !!२!!
नाभी मृगाचे कस्तुरी ! व्यर्थ हिंडे वनांतरीं !!३!!
साखरेचे मूळ ऊस ! तैसा देहीं देव दिसे !!४!!
दुधीं असता नवनीत ! नेणे तयाचे मथित !!५!!
तुका सांगे मूढजना ! देहीं देव का पाहाना !!६!!
                      (अभंग क्र. ४४८२)

देव आपल्या शरीरातच असतो, याचा अर्थ आपल्या ठिकाणी जे सद्गुण असतात, जे चांगले आचारविचार असतात, त्यांच्यामधेच ईश्वराचं अस्तित्व असतं. कित्येकदा माणसाला हे कळत नाही. तो ईश्वराचा शोध घेण्यासाठी उगाचच बाहेरच्या जगात फिरत असतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या सर्वश्रेष्ठ वैभवाचं भान नसलेला हा मनुष्य दुर्दैवीच म्हणावा लागेल. देव त्याच्या अंतर्यामीच असतो, परंतु तो त्याचा शोध घेण्यासाठी उगाचच तीर्थक्षेत्रं धुंडाळत असतो. त्याचं हे वागणं कस्तुरीमृगासारखं असतं. त्या मृगाचा नाभीमधेच कस्तुरी असते. परंतु तो तिचा शोध घेण्यासाठी सगळ्या वनामधे उगाचच हिंडत राहतो. खरं म्हणजे ऊस हेच जसं साखरेचं उगमस्थान असतं, साखर सत्त्वरूपानं मूलतः उसातच असते, तसा देव माणसाच्या देहातच असतो. लोणी दुधातच असतं, परंतु त्या दुधाचं दही बनवावं आणि त्याचं मंथन करून लोणी मिळवावं, हे ज्याला कळत नाही, तो इतर मार्गांनी कितीही प्रयत्न केले, तरी लोणी मिळवू शकत नाही. आपल्या आत डोकावून न पाहणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वाचा नीट शोध न घेणाऱ्या लोकांविषयी तुकाराम करुणेपोटीच नाराजी व्यक्त करतात. तुम्ही असे कसे मूढ आहात, स्वतःच्या शरीरात तुम्ही देवाला का पहात नाही, असा वेडेपणा का करीत आहात, असा प्रश्न त्यांनी लोकांना अगदी तळमळीनं विचारला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचा, स्वरूपाचा आणि स्थानाचा शोध कसा घ्यावा, याविषयीचं तुकारामांनी केलेलं हे मार्गदर्शन सत्यही आहे आणि सुंदरही आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 11 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४५)

तुकारामांनी शुभ आणि अशुभ यांच्या संदर्भात आपल्याला एक अतिशय आश्वासक संदेश दिला आहे. एवढ्या महान संतानं दिलेला हा संदेश आपण ध्यानात घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच, असं म्हणावं लागेल. ते म्हणतात,

४५

शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ ! अशुभ मंगळ मंगळाचे !!१!!
हातीचिया दीपें दुराविली निशी ! न देखिजे कैसी आहे ते ही !!२!!
सुख दुःखाहूनि नाही विपरीत ! देतील आघात हितफळे !!३!!
तुका म्हणे आता आम्हांसी हे भले ! अवघे चि जाले जीव जंत !!४!!
                                (अभंग क्र. २००३)

या अभंगात सर्व दिशा आणि काळ शुभ झाले, एवढेच सांगून ते थांबत नाहीत. सर्वसामान्य माणसं ज्यांना अशुभ म्हणतात, त्या गोष्टी आमच्या दृष्टीनं मंगलातील मंगल, शुभातील शुभ म्हणजे सर्वांत शुभ झाल्या आहेत, असं म्हणतात. तुकारामांवर अपार प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या या वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे, असं मला वाटतं. माणसांमधे आरपार बदल करून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्या या विचारात आहे. याच अभंगात त्यांनी पुढं काढलेले उद्गार कसे आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेले आहेत. हातात घेतलेल्या दिव्यामुळं रात्र दुरावली आहे आणि ती कशी आहे, ते दिसतही नाही इतकी दुरावली आहे, असं ते म्हणतात. हा दिवा विचारांचा आहे. विवेकाचा आहे. ज्ञानाचा आहे. मानसिक सामर्थ्याचा आहे. अज्ञानाची आणि दुबळेपणाची रात्र कुठल्या कुठं पळून गेली आहे. ते केवळ एक आत्मनिष्ठ अनुभव म्हणून ते सांगत आहेत, असं नाही. आपल्या तमाम भावंडांनी हा विचार पचवावा, हे सामर्थ्य प्राप्त करावं, अशीच त्यांची भावना आहे. असं सामर्थ्य प्राप्त झालं, की अशुभाचंही शुभात रूपांतर होतं. आघात देखील हितकारक फळं देतील, याचा अर्थ संकटं नुसती दूर होतील वा नष्ट होतील असं नाही, तर त्या संकटांचंच हितकारक, कल्याणकारक गोष्टींमध्ये रूपांतर होईल. स्वतःचं आंतरिक विश्व बदललं, की बाहेरचं अवघं विश्वही बदलेल. मग कुणी अशुभ, अपवित्र आहे, ही भावना राहणार नाही. सगळे प्राणीही भले वाटू लागतील. चांगले वाटू लागतील. या अभंगाच्या अखेरीस तुकाराम म्हणतात, की सर्व जीवजंतू हे आता त्यांच्या दृष्टीनं भले झाले आहेत. मनाची उत्कट प्रसन्नतेनं फुललेली ही अवस्था आपल्याला लाभावी, असं कुणालाही वाटावं, इतकं मोठं वैभव या उद्गारात आहे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४४)

काही लोक आपल्याकडं विशिष्ट प्रकारच्या शक्ती आहेत, इतरांकडं नसलेलं ज्ञान आहे, असं भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. तुकाराम अशा लोकांवर टीका करतात, याचा अर्थ सर्वसामान्य लोकांनी अशा ढोंगी लोकांपासून सावध रहावं, असंच सांगू इच्छितात. एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे,

४४

सांगो जाणती शकुन ! भूत भविष्य वर्तमान !!१!!
त्यांचा आम्हांसी कंटाळा ! पाहो नावडती डोळां !!२!!
रिद्धीसिद्धींचे साधक ! वाचासिद्ध होती एक !!३!!
तुका म्हणे जाती ! पुण्यक्षयें अधोगती !!४!!
                          (अभंग क्र. १५०१)

आपल्याला शकुन-अपशकुनांची फळं कळतात, आपण अंतर्ज्ञानानं, भूत-भविष्य-वर्तमान अशा तिन्ही काळांतील घटना सांगू शकतो, असे काही लोक म्हणत असतात. ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांचा यांच्यामधे अंतर्भाव होतो. परंतु या लोकांकडं प्रत्यक्षात असं कोणतंही सामर्थ्य नसतं, हे तुकाराम निःसंदिग्धपणे जाणत होते. म्हणूनच, आपल्याला असं सांगणाऱ्यांचा कंटाळा आहे. आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडं पाहणं देखील आपल्याला आवडत नाही, असं तुकाराम अगदी ठणकावून सांगतात. आपल्याला रिद्धीसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत, असं काही जण सांगतात. काही जण आपण 'वाचासिद्ध' आहोत, असं म्हणतात. म्हणजेच, आपण जे जे बोलतो, ते ते घडतं, असं ते भासवतात. अशा प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात, असं तुकाराम म्हणतात. याचा अर्थ, लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांनी पूर्वी जरी काही सत्कर्म केलेली असली, तरी तीही वाया जातात. जे निष्पाप लोकांची वंचना करतात, त्यांचा स्वतःचाही अधःपात होतो, मग ते इतरांचं कल्याण करतील ही शक्यताच नाही. म्हणून, लोकांनी त्यांच्यापासून सावध रहावं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वा विसंबून राहू नये, असं तुकाराम महाराज सुचवत आहेत.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Tuesday, 7 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४३)

लोकांची फसवणूक करणाऱ्या चमत्कारासारख्या नाना प्रकारच्या चुकीच्या आणि घातक समजुती, प्रथा इत्यादींना तुकारामांचा कमालीचा विरोध होता. आपली ही भूमिका त्यांनी एका अभंगात अनेक उदाहरणांनी स्पष्ट केली आहे. आपल्या गोरगरीब लोकांनी अशा प्रथांसाठी आपलं धन, आपला वेळ, आपले श्रम वाया घालवू नयेत, हा तुकारामांच्या मिळणारा संदेश आपल्याला सदैव मार्गदर्शन करणारा आहे. ते म्हणतात,

४३

कपट काही एक ! नेणे भुलवायाचे लोक !!१!!
तुमचे करितो कीर्तन ! गातो उत्तम ते गुण !!२!!
दाऊ नेणे जडीबुटी ! चमत्कार उठाउठी !!३!!
नाही शिष्यशाखा ! सांगो अयाचित लोकां !!४!!
नव्हे मठपति ! नाही चाहुरांची वृत्ती !!५!!
नाही देवार्चन ! असे मांडिले दुकान !!६!!
नाही वेताळ प्रसन्न ! काही सांगो खाण खुण !!७!!
नव्हे पुराणिक ! करणे सांगणे आणीक !!८!!
नेणे वाद घटा पटा ! करिता पंडित करंटा !!९!!
नाही जाळीत भणदी ! उदो म्हणोनि आनंदी !!१०!!
नाही हालवीत माळा ! भोवते मेळवुनि गबाळा !!११!!
आगमीचे कुडे नेणे ! स्तंभन मोहन उच्चाटणे !!१२!!
नव्हे यांच्या ऐसा ! तुका निरयवासी पिसा !!१३!!
                     (अभंग क्र. २७२)

मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट जाणत नाही. मी तुमचं कीर्तन करतो आणि उत्तम गुण गातो. मी जडीबुटी दाखवणं जाणत नाही. मी आकस्मिक म्हणजेच निसर्गातील कारणकार्यसंबंधाच्या विरोधात जाणारे चमत्कार दाखवणं जाणत नाही. माझी शिष्यशाखा नाही. मी बोलावलेले नसताना कोणी लोक आले, तर त्यांना काही सांगतो, इतकंच. मी मठपती नाही. मी उदरनिर्वाहासाठी कुणाकडं चाहूरभर जमीन मागत नाही. मी देवपूजा करण्याचं दुकान मांडलेलं नाही. लोकांना काही खाणाखुणा सांगण्यासाठी मला वेताळ प्रसन्न नाही. मी करायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं असं करणारा पुराणिक नाही. करंट्या पंडितासारखा घटा-पटाचा वाद करणं मी जाणत नाही. मी 'उदो' म्हणून आनंदानं धूप जाळत नाही. मी गबाळ्या म्हणजेच भोळ्या लोकांना भोवती जमवून माळा हलवीत नाही. मी धर्मशास्त्रातील कोड्यासारख्या गूढ गोष्टी जाणत नाही. मी व्यक्तीला जागच्या जागी थांबवणं, तिला मोहिनी घालणं, तिचं उच्चाटन करणं, अशा वेदातील म्हणजेच या संदर्भात अथर्ववेदातील विद्या जाणत नाही. तुका नरकात वास्तव्य करणाऱ्या म्हणजे दुर्गतीला जाणाऱ्या या लोकांसारखा वेडा नाही.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Monday, 6 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४२)

जो मनुष्य स्वानुभवाच्या आधारे डोळस बनतो, चोखंदळ बनतो, त्याच्यापुढं कुणाची ढोंगबाजी चालत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एका अभंगात अनेक उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात,

४२

तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोलें ! जरी हिंडविले देशोदेशीं !!१!!
करणीचे काही न मने सज्जना ! यावे लागे मना वृद्धांचिया !!२!!
हिरियासारिखा दिसे शिरगोळा ! पारखी ते डोळां न पाहाती !!३!!
देऊनिया भिंग कामाविले मोती ! पारखिया हातीं घेता नये !!४!!
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ ? ! आपुले हे चित्त आपणा ग्वाही !!५!!
                              (अभंग क्र. ४१०१)

तांब्याचं नाणं वेगवेगळ्या देशांत नेऊन चालविण्याचा प्रयत्न केला, तरी ते खऱ्या (सोन्याचा) नाण्याच्या मोलानं चालत नाही. चुकीचं वागणं सज्जनाच्या मनाला आवडत नाही. आपलं वागणं अनुभवी माणसांच्या मनाला पटायला हवं. गारगोटी हिऱ्यासारखी दिसते, परंतु हिऱ्याची पारख असलेले लोक तिच्याकडं नजरही टाकत नाहीत. काच देऊन मोती घेण्याचा प्रयत्न केला, तर पारख असलेले लोक ती काच हातातही घेत नाहीत. तुकाराम म्हणतात, उगाच नटून काय उपयोग ? आपण कसे आहोत, याला आपलं मन साक्षी असतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Friday, 3 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४१)

तुकारामांनी एका अभंगात अनुभवाचे वेगवेगळे पैलू काही उदाहरणांच्या आधारे स्पष्ट करून दाखविले आहेत. ते म्हणतात,

४१

लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री ! अग्नि टणत्कारीं दिसो येतो !!१!!
सांगावे ते काई सांगावे ते काई ? ! चित्ता होय ठायीं अनुभव तो !!२!!
अन्नें सांगो येतो तृप्तीचा अनुभव ! करूनि उपाव घेऊ हेवा !!३!!
तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन ! तेथे कोणा कोण नाव ठेवी ? !!४!!
                   (अभंग क्र. ३१५२)

अग्नी निर्माण करण्यासाठी लोखंड कापूस गारगोटी यांसारखी साधनसामग्री सिद्ध असली, तरी त्यांचं घर्षण झाल्यानंतरच अग्नी प्रकट होतो. याचा अर्थ नुसती साधनसामग्री असून भागत नाही. तिचा योग्य रीतीनं प्रयत्नपूर्वक वापर केला, तरच आपल्याला हवं ते फळ मिळतं. या बाबतीत 'सांगावे ते काई' असा प्रश्न त्यांनी दोनदा विचारला आहे. याचा अर्थ अनुभवाचं महत्त्व कितीही सांगितलं, तरी ते वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही, अशी त्यांची भावना आहे. साध्य प्राप्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा प्रयत्नपूर्वक वापर केल्यानंतरच फळ मिळतं, हा अनुभव आपल्या मनाला मिळतो, असं ते म्हणतात. अन्नाचं नुसतं वर्णन करून तृप्ती मिळत नाही. अन्नाचं भक्षण केलं, तर तृप्तीचा अनुभव येतो आणि मग त्या अनुभवाचं वर्णन करता येतं. हे एकदा कळलं, की आपण अन्न मिळविण्याचा उपाय करतो. जगामधे वेगवेगळ्या माणसांचा वेगवेगळ्या माणसांशी संपर्क येतो, लोक विविध पदार्थांच्याही संपर्कात येतात. अशा वेळी हा संपर्क एकमेकात मिसळून गेल्यासारखा अनुकूल झाला, तर जीवन आनंदी होतं. एकमेकांच्या संपर्कात येणारे लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांवर प्रेम करतात. मग कोणी कोणाला नावं ठेवत नाहीत. दूषणं देत नाही. हा मनाला प्रसन्न करणारा ऐक्याचा उत्कट अनुभव असतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Thursday, 2 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४०)

ऐकीव माहिती, काल्पनिक कथा यांसारख्या गोष्टींपेक्षा अस्सल अनुभवाला महत्त्व देणं, हे तुकारामांच्या विचारसरणीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. एका अभंगात ते म्हणतात,

४०

नका दंतकथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण ? !!१!!
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार ! न चलती चार आम्हांपुढे !!२!!
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ! राजहंस दोन्ही वेगळाली !!३!!
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येरा गाबाळाचे काम नाही !!४!!
                     (अभंग क्र. ३१२८)

इथं कुणी दंतकथा सांगू नका. अनुभवाचा आधार नसलेल्या दंतकथांमधील कोरडे बोल कोण मान्य करणार ? या जगात अनुभव हाच शिष्टाचार व्हायला हवा. अनुभवाचं पाठबळ नसलेले चाळे आमच्यापुढं चालणार नाहीत. अस्सल अनुभव कोणता आणि निराधार दंतकथा कोणती, हे विवेकी माणसाला नक्कीच ओळखता येतं.  दूध आणि पाणी एकत्र मिसळून आलं, तरी राजहंस त्यांना वेगळं करून योग्य ती निवड करतो, तसंच विवेकी माणसाचं असतं. अस्सल अनुभव जगणाऱ्या विवेकी, जातिवंत माणसांकडूनच खऱ्या-खोट्याचा योग्य निवाडा केला जातो. ज्यांच्याकडं विवेक नसतो, अशा भ्रमांवर जगणाऱ्या गबाळ्या लोकांना असा निवाडा करता येत नाही, हे त्यांचं काम नव्हे.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८