Tuesday, 29 November 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील २)

आईवडील 

करावे गोमटें | बाळा, माते ते उमटे ||१||
आपुलिया जीवाहूनी | असे वाल्हे ते जननी ||२||
वियोग ते तिस | त्याच्या उपचारें ते विष ||३||
तुका म्हणे पायें | डोळा सुखावे ज्या न्यायें ||४||
                              (अभंग क्रं. २६५)

आपल्या मुलांसाठी काहीतरी गोडधोड करावं, असं आईला वाटत असतं. तिला आपलं मूल आपल्या जीवापेक्षाही अधिक प्रिय वाटत असतं. त्याच्यासाठी काही चांगलं-चुंगलं करता आलं नाही, त्याचा वियोग झाला, तर ती घटना तिला विषासारखी वाटते. याउलट, त्याच्यासाठी काही चांगलं करता आलं, तर त्याला मिळालेल्या आनंदानं तिचा जीव सुखावतो. तिच्या या सुखाचं वर्णन करताना तुकाराम आपल्या नेहमीच्या अनुभवातलं एक सुरेख उदाहरण देतात. कष्टाची कामं करताना उन्हा-तान्हात हिंडल्यामुळं एखाद्याचे डोळे जळजळू लागले असतील आणि अशा वेळी त्याच्या डोळ्यांवर काही उपचार करण्याऐवजी त्याच्या पायांना थंडगार तेल वगैरे चोळलं, तर डोळ्यांची जळजळ थांबते आणि ते सुखावतात. उपचार पायांवर आणि सुख मात्र डोळ्यांना, हा आपला अनुभव आहे. मायलेकरांच्या बाबतीत असंच घडतं. उपचार मुलावर आणि सुख आईला, असंच हे आगळं-वेगळं नातं आहे..

No comments:

Post a Comment