आईवडील
जगामधे जिथं आपलं मस्तक नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. तुकाराम महाराज त्यांच्याविषयी म्हणतात,
१
मायबापे केवळ काशी |
तेणें न नदीने तीर्थासी || १ ||
पुंडलीकें काय केले ? |
परब्रह्म उभे ठेले || २ ||
तैसा होई सावधान |
ह्रदयी धरी नारायण || ३ ||
तुका म्हणे मायबापे |
अवघी देवाची स्वरुपे || ४ ||
(अभंग क्र. २९०६)
आईवडील म्हणजे शुद्ध काशी होत. जो मनुष्य आईवडीलांच्या सहवासात असेल, त्यानं काशीची तीर्थयात्रा केल्यासारखं होतं. त्यानं तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते. अशा वेळी पुंडलिकानं काय केलं ते ध्यानात घ्यावं. तो आईवडीलांची सेवा करणं थांबवून देवाकडं धावला नाही. त्यानं देवालाच उभं रहायला लावलं. तेव्हा, प्रत्येकानं पुंडलिकाप्रमाणं सावध रहावं. ईश्वराला आपल्या ह्रदयात ठेवावं, पण त्याला प्राप्त करण्यासाठी आईवडीलांची सेना करणं थांबवू नये. कारण, आईवडील म्हणजे पूर्णांशानं ईश्वराचं स्वरुप होत. तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत, की आईवडीलांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय.
No comments:
Post a Comment