Wednesday, 30 November 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ३, ४)

(आईवडील) अभंग 

लागलिया मुख स्तनां | घाली पान्हा माऊली ||१||
उभयतां आवडी लाडें |कोडें कोड पुरतसे ||२||
मेळविता अंगे अंग | प्रेमें रंग वाढतो ||३||
तुका म्हणे जड भारी | अवघे शिरीं जननीचे ||४||

                                     (अभंग क्र. ८३१)

(आईवडील) अभंग  ४

न लगे मायेसी बाळें निरवावे |
आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ||१||
मज का लागला करणे विचार ? |
ज्याचा त्याचा भार त्याचे माथां ||२||
गोड धड त्यासी ठेवी न मागता |
समाधान खाता नेदी मना ||३||
खेळता गुंतले उमगूनी आणी |
बैसोनिया स्तनीं लावी बळें ||४||
त्याच्या दुःखेपणें आपण खापरीं |
लाही तळीं वरी होय जैसी ||५||
तुका म्हणे देह विसरे आपुला |
आघात तो त्याला लागो नेदी ||६||

                                     (अभंग क्र. १२३३)

दूध पिण्यासाठी मूल आईच्या छातीला तोंड लावतं आणि आईला पान्हा फुटतो, हा मुलाचं मूलपण आणि आईचं आईपण तृप्त करणारा एक उदात्त आनंदसोहळा असतो. तुकाराम महाराजांनी इथं त्या सोहळ्याचं चित्रच आपल्या डोळ्यांपुढं उभं केलं आहे. आई मुलाचे जे लाड करते, त्यामुळं उभयतांना आनंद होतो. ती कौतुकानं त्याला अंगावर पाजतो, तेव्हा मायलेकरांना होणारा एकमेकांचा स्पर्श हा वात्सल्याला उत्कट बनविणारा असतो. खरं तर आई आणि मूल यांचं नातंच असं आहे, की मुलाला कशाचीही चिंता करावी लागत नाही. जे काही जड जाणारं असेल, भारी पडणारं असेल, त्याची देखील त्याला काळजी नसते. त्या सगळ्याचा भार आईनं आनंदानं आपल्या डोक्यावर घेतलेला असतो.

    विठ्ठलाने आपला म्हणजे तुकारामांचा भार स्वतःच्या मस्तकावर घ्यावा, त्यांना स्वतःला कसली काळजी करायला लावू नये, असं त्याला विनवताना तुकाराम आईचं उदाहरण देतात. आपल्याला अमुक एक गोष्ट हवी, असं मुलानं आईला सांगण्याची वेळ देखील येत नाही. आई आपल्या आईपणाच्या स्वभावानंच त्याला जवळ ओढून घेते. खरं तर मूल तिच्या गर्भात असतं, तेव्हापासूनच तिनं त्याचा भार आपल्या मस्तकावर घेतलेला असतो. त्यानं काही मागितलेलं नसताना ती त्याच्यासाठी गोडधोड ठेवते. त्यानं पोट भरुन खाल्लं, तरी तिचं समाधान होत नाही, त्यानं आणखी खावं असं तिला वाटत राहतं. ते खेळण्यात गुंतलेलं असलं, तरी ती त्याला समजावून आणते आणि जबरदस्तीनं त्याला अंगावर पाजते. त्याला काही दुःख झालं, तर लाह्या भाजण्याच्या खापरावर लाही जशी वरखाली होते, तसा तिचा जीव वरखाली होतो. ती आपलं शरीर विसरुन जाते, परंतु त्याला कसलाही आघात पोचू देत नाही. आईच्या प्रेमाची निरपेक्षता आणि समर्पणशीलता खरोखरच पराकाष्ठेची असते.

Tuesday, 29 November 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील २)

आईवडील 

करावे गोमटें | बाळा, माते ते उमटे ||१||
आपुलिया जीवाहूनी | असे वाल्हे ते जननी ||२||
वियोग ते तिस | त्याच्या उपचारें ते विष ||३||
तुका म्हणे पायें | डोळा सुखावे ज्या न्यायें ||४||
                              (अभंग क्रं. २६५)

आपल्या मुलांसाठी काहीतरी गोडधोड करावं, असं आईला वाटत असतं. तिला आपलं मूल आपल्या जीवापेक्षाही अधिक प्रिय वाटत असतं. त्याच्यासाठी काही चांगलं-चुंगलं करता आलं नाही, त्याचा वियोग झाला, तर ती घटना तिला विषासारखी वाटते. याउलट, त्याच्यासाठी काही चांगलं करता आलं, तर त्याला मिळालेल्या आनंदानं तिचा जीव सुखावतो. तिच्या या सुखाचं वर्णन करताना तुकाराम आपल्या नेहमीच्या अनुभवातलं एक सुरेख उदाहरण देतात. कष्टाची कामं करताना उन्हा-तान्हात हिंडल्यामुळं एखाद्याचे डोळे जळजळू लागले असतील आणि अशा वेळी त्याच्या डोळ्यांवर काही उपचार करण्याऐवजी त्याच्या पायांना थंडगार तेल वगैरे चोळलं, तर डोळ्यांची जळजळ थांबते आणि ते सुखावतात. उपचार पायांवर आणि सुख मात्र डोळ्यांना, हा आपला अनुभव आहे. मायलेकरांच्या बाबतीत असंच घडतं. उपचार मुलावर आणि सुख आईला, असंच हे आगळं-वेगळं नातं आहे..

Monday, 28 November 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील १)

                      आईवडील
जगामधे जिथं आपलं मस्तक नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. तुकाराम महाराज त्यांच्याविषयी म्हणतात,

१   
मायबापे केवळ काशी |
तेणें न नदीने तीर्थासी || १ ||
पुंडलीकें काय केले ? |
परब्रह्म उभे ठेले || २ ||
तैसा होई सावधान |
ह्रदयी धरी नारायण || ३ ||
तुका म्हणे मायबापे |
अवघी देवाची स्वरुपे || ४ ||
                 (अभंग क्र. २९०६)

आईवडील म्हणजे शुद्ध काशी होत. जो मनुष्य आईवडीलांच्या सहवासात असेल, त्यानं काशीची तीर्थयात्रा केल्यासारखं होतं. त्यानं तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते. अशा वेळी पुंडलिकानं काय केलं ते ध्यानात घ्यावं. तो आईवडीलांची सेवा करणं थांबवून देवाकडं धावला नाही. त्यानं देवालाच उभं रहायला लावलं. तेव्हा, प्रत्येकानं पुंडलिकाप्रमाणं सावध रहावं. ईश्वराला आपल्या ह्रदयात ठेवावं, पण त्याला प्राप्त करण्यासाठी आईवडीलांची सेना करणं थांबवू नये. कारण, आईवडील म्हणजे पूर्णांशानं ईश्वराचं स्वरुप होत. तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत, की आईवडीलांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय.

संत तुकारामांचे अभंगशतक (डॉ. आ. ह. साळुंखे)

शिवधर्म संसदेचे निवेदन: -

संत तुकारामांचे अभंगशतक ही संग्रहमालिका ...

मानवाची प्रगती व कल्याण साधण्यासाठी अनेक महामानवांनी आपले आयुष्य वेचले आहे. संत तुकाराम महाराज हे त्यांच्यापैकी एक होत. त्यांचे विचार त्यांच्या अभंगातून प्रकट झालेले आहेत. जीवनाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मार्गदर्शक असे हे विचार सार्वकालिक आहेत. या अभंगशतकाद्वारे त्यांच्या विचारांचे स्मरण करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करु या...

हे सर्व अभंग मानवी मनाला स्वतंत्र आणि प्रसन्न, विनम्र आणि तरीही उन्नत करणारे आहेत. कीर्तन आणि भजन यांच्या माध्यमातूनही हे सर्वसामान्य पोहचावेत व तसे झाल्यास आपल्या समाजाचा निकोप आणि सर्वांगीण विकासास नक्की हातभार लागेल. या अभंगशतकातील अभंगांची निवड आणि त्याचे विवरण डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले आहे.

तुकोबांच्या अभंगशतकाची एक संग्रहमालिका आपण आजपासून सुरु करत आहोत...

              शिवतत्त्वाला नमन असो |
          जिजाऊजननीला नमन असो |
      संत तुकाराम महाराजांना नमन असो |

माणसानं आयुष्यात संत तुकारामांचा निदान एक तरी अभंग ऐकावा, म्हणावा आणि अनुभवावा, म्हणजे नीट कसं जगावं आणि आनंदरसामधे भिजून कसं निघावं, हे कळल्याखेरीज रहात नाही...!