श्रम न करता कोणाकडून फसवून वा लुबाडून काही घेणं आणि या मार्गानं श्रीमंत बनणं वा आपला संसार समृद्ध करणं तुकारामांना मान्य नव्हतं. एका अभंगात ते म्हणतात,
५०
चाकरीवाचून ! खाणे अनुचित वेतन !!१!!
धणी काढोनिया निजा ! करील ये कामाची पूजा !!२!!
उचितावेगळे ! अभिलाषे तोंड काळे !!३!!
सांगे तरी तुका ! पाहा लाज नाही लोकां !!४!!
(अभंग क्र. २२१३)
ज्या कामासाठी वेतन घ्यायचं, ते काम न करता वेतन घेणं हे अनुचित होय. कुणीही कामचुकारपणा करू नये, हे समाजव्यवस्थेच्या निकोप धारणेसाठी आवश्यक असतं. परंतु अनेकदा समाजामधे वेगळं चित्र दिसतं. अनेकांना कष्ट नको असतात आणि सुखोपभोग मिळविण्याची मोठी लालसा मात्र असते. व्यक्तिगतदृष्ट्या हे अनैतिक असतं आणि समाजहिताच्या दृष्टीनंही घातक असतं. तुकारामांनी या अभंगाद्वारा तमाम लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. मालकाला जे काम करून घ्यायचं असतं, ते काम झाल्यानंतर तो काम करणाऱ्याच्या कामाची पूजा करतो. परंतु, जो या उचित पद्धतीपेक्षा वेगळं करतो आणि काम न करता वेतनाची अभिलाषा करतो, त्यांचं तोंड काळं होय. याचा अर्थ कामचुकारपणा करून वेतन घेणाऱ्याची अखेरीस अपकीर्तीच होते, तो लोकांच्या नजरेतून उतरतो, लोक त्याला ऐतखाऊ म्हणतात आणि खरं काम करण्याचा जो आनंद असतो, त्या आनंदालाही तो मुकतो. तुकाराम हे आग्रहानं सांगत असतानाही काही लोकांवर त्यांचा योग्य परिणाम होत नव्हताच, त्यांचा अनुकूल प्रतिसाद मिळत नव्हताच, त्यांच्यामधे परिवर्तन होत नव्हतंच. कितीही सांगितलं, तरी त्याकडं लक्ष न देणाऱ्या या लोकांना तुकाराम काहीशा त्राग्यानं निलाजरे म्हणतात.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८